लेखक-
श्री.नितीन रा.पिसाळ
विषय विशेषज्ञ- पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
कृषी जर्नलिस्ट- सतनाम भारत न्यूज
मो.बा- 8007313597

प्रस्तावना-
पावसाचे थेंब जमिनीवर पडले की मातीही सुगंधित होते. शेतीला नवे प्राण मिळतात, हिरवळ बहरते… पण त्या पावसात आपल्या जनावरांच्या डोळ्यांत मात्र वेदनेचं सावट असतं. ते बोलू शकत नाहीत, तक्रार करू शकत नाहीत… पण भिजलेली कातडी, थरथरती अंगं, थंड वाऱ्याचा स्पर्श आणि पोटातले दुखणं- हे त्यांना सतत सतावत असतं.
पावसात जर गोठा नीट झाकलेला नसेल, चाऱ्याची नीट व्यवस्था नसेल तर सर्वात मोठा फटका या मुक्या जनावरांनाच बसतो. त्यांच्या नजरेतला तो त्रास… बघताना काळजाचं पाणी होतं. पावसात भिजल्यामुळे त्यांना काय काय सहन करावं लागतं, हे तुम्हालाही माहीत आहे, पण आज थोडंसं त्यांच्या भावनेतून बघूया…
पावसात जनावरे भिजल्यामुळे जनावरांना होणारा त्रास व त्याचे परिणाम…
- अंग थरथर कापत असतं- ताप, सर्दी, ठसक्याचा त्रास होतो.
- पावसात भिजलेलं अंग ताप येण्याची सुरुवात असते- पण ते सांगू शकत नाहीत.
- थंडीने निमोनिया होतो, फुफ्फुस बिघडतं- जीव धोक्यात येतो.
- पायातील ताण तणाव- चिखलामध्ये तासनतास उभं राहून पाय सडतात, सुजतात तसेच चालता येत नाही.
- कासेचे आजार- सड ओले राहिल्यास स्तनदाहाचा धोका संभवतो तसेच दूध दूषित होते परिणामी जनावराला वेदना सहन करता येत नाहीत.
- जनावराला अशक्तपणा येतो, दूध उत्पादन कमी होतं- पण तेही कुणाला सांगत नाहीत.
- भूक मंदावते, खाणं-पिणं कमी होतं- कारण पोट बिघडलेलं असतं.
- ओला चारा खाताना पचन बिघडतं- पोट फुगतं,तसेच दुखतंही.
- गोठा ओला असेल तर गोठ्यात जंतूसंसर्ग वाढतो- त्यामुळे गोठ्यात आजार वाढतात.
- चिखलात पडून पाय मोडतात, अंग दुखतं- पण ते गप्प राहतात.
- डोळे लाल होतात, कान सुजतात, त्वचेवर बुरशी- आणि तरीही ते शांतच राहतात.
- जनावरांना झोपही लागत नाही- कारण अंग सतत ओलसर आणि थंड असतं.
- सारखे भिजल्यामुळे जनावरे आजारी पडतात आणि हळूहळू मरणाच्या जवळ जातात- आपल्याला हे सर्व उशिरा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो.
- जनावरांना भरवलेला चारा, आपुलकीने घेतलेली काळजी- सगळं व्यर्थ वाटतं जेव्हा एक जीव डोळ्यासमोरून निघून जातो.
- शेवटी उरतो तो एकच प्रश्न- आपण थोडी जास्त काळजी घेतली असती, तर…?
तुमच्या गोठ्यातली ती गाय, ती म्हैस, तो बैल- हे तुमचं कुटुंबच आहेत. शेतीचा, दुधाचा, तुमच्या घरचं भाग्य घडवणारा तो मौल्यवान जीव आहे.
तो जर आजारी पडला, दुखावला, तर फटका तुमच्या उत्पादनालाच नाही, तर तुमच्या मनालाही बसतो.
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच- गोठ्याची झाकण व्यवस्था, चाऱ्याची साठवणूक, कोरडा गोठा व स्वच्छ जागा, औषधपाणी आणि नियमित तपासणी- ही सगळी काळजी आता घ्या. कधी कधी आपण वेळेत घेतलेल्या निर्णयामुळे एक जीव वाचू शकतो.
“पशुपालकांनो!! आता नेहमी ठेवा… आपल्या मुक्या जनावरांसाठी एक पाऊल पुढे…”
आज ठरवूया- या वर्षी पावसात कोणतंही जनावर भिजणार नाही, आजारी पडणार नाही आणि त्यांचा प्रत्येक दिवस सुरक्षित असेल. कारण ते तुमच्या शेतीचं आधारस्तंभ आहेत…आणि तुमच्या प्रेमाचेही साथीदार!

